Sunday 5 August 2012

राजकारण २०१२

परवाचीच गोष्ट, शेजारची  ८ वित शिकणारी  छकू  आली होती, म्हणाली- काका मला एक निबंध लिहायचा आहे  , त्यात तुम्ही  मदत करता का?  म्हंटलं कशावर लिहायचा  आहे ग तुला निबंध ? तर म्हणे,   राजकारणावर! मुलांना राजकारण समजावं म्हणून  टीचरने  राजकारणावर एक निबंध लिहून आणायला सांगितलाय  .म्हंटलं ठीक आहे.. सांगतो तुला. आणि छकू बसली समोर कागद पेन घेऊन लिहून घ्यायला.
तिचं लक्ष  बाजूला पडलेला मटा  कडे गेलं , तो उचलला आणि   म्हणाली काका, हे बघा, बाळासाहेब आणि शरद पवारांची युती होणार आहे- तिचं हे वाक्य ऐकून   मला एकदम आश्चर्याचा धक्काच बसला !   मी म्हंटलं की काहीतरीच काय म्हणतेस-  तर तिने मटा समोर धरला.  ती बातमी मी आधीच वाचलेली होती, त्यात बाळासाहेब म्हणाले होते, की शरद राव माझे फार जवळचे मित्र आहेत -
छकू आता  त्याचं असं आहे, की  ते मित्र आहेत असे जरी म्हणाले  असले तरीही ते इलेक्शन मधे एकमेकांविरुद्ध आपापले कॅंडीडॆट्स उभे करणार आहेत.  अशी कन्फ्युज होऊ नकोस.. थोडं व्यवस्थित सोपं करून तुला मी  राजकारण  म्हणजे  काय ते सांगतो बघ. कुठल्याही राजकीय  पक्षाला  एकट्याच्या बळावर महाराष्ट्राची सत्ता काबिज करता येणे शक्य नाही, ही गोष्ट सगळ्याच नेत्यांना माहिती आहे. मग आता इलेक्शन जिंकायला म्हणून हे सगळे पक्ष आपापसात युती करतात आणि इलेक्शन लढतात. ही युती का आणि कशी होते? याचे उत्तर मला तरी माहिती नाही.तरी पण जे काही माहिती आहे ते थोडक्यात सांगतो!
भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आणि  त्याचा मित्र पक्ष म्हणून शिवसेनेशी नियमित पणे प्रत्येक निवडणुकीत  युती होत असते. आता असं पहा,  की बाळासाहेब म्हणतात की शरद पवार माझे मित्र , शरद पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे- आणि सोनिया कॉंग्रेसच्या मित्र पक्षातले ! सोनिया कॉंग्रेस ही  शिवसेनेची शत्रू पण राष्ट्रवादीची मित्र!  राष्ट्रवादी कॉंग्रेसची   भाजपा हा शत्रू नंबर एक  . गडकरी हे भाजपाचे अध्यक्ष आहेत, पण वैय्यक्तीक पातळीवर ( म्हणजे काय ते मला विचारू नकोस छकू )       पवारांचे मित्र  आहेत आणि तरीही  ते  राष्ट्रवादीचे शत्रू आहेत – समजलं का तुला?   काय म्हणतेस छकू??     शरद पवार  हे मित्र पक्षाचे  (भाजपाचे )शत्रू या नात्याने बाळासाहेबांचे/गडकरींचे पण शत्रू असायला हवेत? नाही का? एकदम सोप्पं आहे बघ!
अगं छकू  असं  काय करतेस?  शरदराव, बाळासाहेबांचे मित्र   आहेत ,  तर मग त्यांच्याशी युती न करता – शिवसेनेचॊ युती ही  भाजपा बरोबर  का करतात ?  गडकरी हे आपले मित्र आहेत असे बाळासाहेबांनी सांगितल्याचे  कधी आठवत नाही  म्हणतेस – खरंय गं.. मला पण नाही आठवत. दर निवडणूकीच्या वेळेस बाळासाहेब भाजपा नेत्यांबद्दल  पेपर मधे उलटसुलट काहीतरी बातम्या देतात ? एक वर्षापूर्वीची बातमी पहा इथे..  जाऊ दे तुला नाही कळायचं  .
आता असं बघ, मागच्या निवडणुकीत रामदास आठवले यांनी शरद पवारांच्या   राष्ट्रवादीच्या बरोबर युती केली होती.अगदी गळ्यात गळे  घालून वावरले ते शरदरावांच्या . याचं कारण असं की तेंव्हा राष्ट्रवादीला वाटले की आठवलेंच्या मुळे दलित मते कॉंग्रेसकडे वळतील. पण दलित मतदार  आता    प्रगल्भ झालाय, रामदास आठवले, किंवा इतर कुठल्याही गटाच्या सांगण्यानुसार मतदान करीत नाही. स्वतःची बुद्धी वापरून मतदान करतात, त्या मुळे मागच्या निवडणुकीत रामदास आठवलेंचा  पार सुपडा साफ झाला. अजिबात मत दिले नाहीत त्यांच्या कॅंडीडॆट्सला. असं म्हणतात, की , तेंव्हा आठवले यांना  संशय आला होता, की शरदरावांनी आपले परममित्र बाळासाहेब यांच्याबरोबर हातमिळवणी करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेला मत द्या असे सांगितले होते. बहुतेक आठवलेंची अपेक्षा असेल की यंदाही तसंच काही तरी होईल आणि आपल्याला राष्ट्रवादीची मते मिळतील- म्हणून या वर्षी शिवसेनेबरोबर युती केली असावी का? किती सोपं आहे बघ राजकारण! कित्ती कित्ती भोळे आहेत ना आठवले?
राज ठाकरे मनसेचे जरी सर्वोसर्वा असले तरीही त्यांचा विश्वास हा  शिवसेना    म्हणजे शत्रूपक्ष नंबर एक चे अध्यक्ष बाळासाहेबांवर आहेच. शरदराव राज ठाकरे यांचे पण मित्र,  पण त्यांच्या मनसे या पक्षाच्या  शत्रू न्ंबर दोनचे अध्यक्ष! राज पण राष्ट्रवादीचे शत्रू. नारायण राव यांनी पण आपला कोंकणात एक “स्वाभिमान” पक्ष काढल्यावर   राज ठाकरेंचे मित्र झाले – बहुतेक शत्रूचा शत्रू तो आपला मित्र- म्हणून  असे असावे.  राणे, बाळासाहेबांचे शत्रू , बाळासाहेब – राज ठाकरेंचे शत्रू, पण राज ठाकरे हे बाळासाहेबांना शत्रू मानत नाहीत, तर केवळ शिवसेनेला शत्रू मानतात , शरद पवार हे राज ठाकरे, नारायण राणे, उद्धव, बाळासाहेब, गड्करी,सोनिया गांधी  या सगळ्यांचे मित्र..- किती सोपं आहे की नाही??.
राज ठाकरेस्वतःचा वेगळा पक्ष असतांना सुद्धा आपल्या शत्रू पक्ष म्हणजे   शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब यांचा जाहीर पणे  मिडीया समोर पोवाडा गात असतात.
मध्यंतरी एकदा राज ठाकरे आपल्या शत्रू पक्ष म्हणजे भाजपाच्या गुजरात मधे जाऊन आल्यावर  आपल्या शत्रूपक्षाच्या मुख्यमंत्र्यांची म्हणजे नरेंद्र मोदी यांची  तोंडफाटेस्तोवर स्तुती केली होती. तेंव्हा उगाच मिडियाने पण पिल्लू सोडले होते की आता बहूतेक शिवसेना , मनसे आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार म्हणून. पण तसं नसतं. तुझी मेमरी फारच विक आहे गं छकू, आठवतं का? राज ठाकरेंच्या चार आमदारांना डीबार केले गेले होते. नंतर त्यांना पुन्हा रिइन्स्टेट करवुन घेण्यासाठी राज ठाकरेंच्या आमदारांनी स्वतः विरोधी पक्षात असूनही सत्ताधारी शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला   सरकार वाचवण्यासाठी मतदान केले होते. :)
उघडपणे एकमेकांवर चिखलफेक करण्याचे काम उद्धव आणि राज करत असतात. त्या दोघांच्या या अशा  वागण्याने आपल्यासारख्या सामान्य बिनडोक जनतेचे खूप मनोरंजन होते- आणि शरदरावांचा ( त्यांच्या वैय्यक्तिक मित्राचा) फायदा होत असतो. अधूनमधून दादा पण यात आपले हात धुवून घेत असतात.
काही दिवसांपूर्वी बाळासाहेबांच्या महालात छगनराव पण गेले होते भेटायला. तेंव्हा अशीही चर्चा होती की ते आता राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत परत जाणार – पण छकू , ती पण एक चाल होती. बाळासाहेबांचा वापर करून घेतला होता , छगनरावांनी, आपले कॉंग्रेसमधले स्थान पक्के करून घ्यायला. समजलं कां तुला? छगनराव गेले मातोश्री वर आणि तिकडे शरदराव एकदम अस्वस्थ झाले होते बघ. आठवते का तुला ते?? असो.
ह्या सगळ्या राजकारण्यांच्या दृष्टीने  राजकारण म्हणजे एक खेळ आहे. या खेळात वेगवेगळे चेहेरे लावून जोकर सारख्या कोलांट उड्या मारून हे राजकारणी आपले मनोरंजन करत असतात  आणि त्याच सोबत खेळ खेळतांना डाव कशा जिंकायचा किंवा विरोधकांचा डाव कसा उलटवायचा  हाच विचार करत असतात.  नेता जितका मोठा- खेळ तितकाच मोठा. खेळ पहातांना आपल्याला उगाच असं  वाटत असतं  की आपली फुकट करमणूक होत आहे, पण तसे नाही- त्या साठी आपण नकळत फार मोठी किंमत मोजत असतो.
बरं छकू , ते जाऊ दे, आता तुला समजलं ना राजकारण म्हणजे काय ?? चल लिही बघू आपला निबंध, आणि जर काही समजलं नाही तर मला विचार मी समजावून सांगेन  बरं का तुला.

No comments:

Post a Comment