Saturday 28 April 2012

लग्न

कालपासून काहीच सुचत नाही आहे. परवा वडिलांचा आणखीन एका स्थळबद्दल फोन आला होता. त्यात हे डोक दुखण्याचे कमी होत नाही आहे. बहुतेक पुढच्या महिन्यात ते स्थळ पाहण्याचा कार्यक्रम ठरेल. ‘अप्सरा’ बद्दल बहिणाबाईशी बोलायला परवा गेलो होतो. पण तीच ‘सॉफ्टवेअर मधील नको’. काय बोलू आता तिच्याशी. आईने बहिणाबाईला फोन केला होता. ते आधी म्हटले ना मी मागील दोन आठवड्यापूर्वी पाहिलेले ते ‘सोलापूर’च्या स्थळाबद्दल. मी चुकून ‘सांगली’ म्हटले. क्षमा असावी. आत्ता वडिलांचा पुन्हा फोन आला होता ‘की त्या स्थळाचा सारखा फोन येत आहे. त्यांना काय सांगायचे म्हणून’. आता माझ्या आई आणि वडिलांना ते स्थळ पसंत पडलेले आहे. पण मला काहीच वाटत नव्हते. म्हणजे सगळे छान आहे त्या स्थळाचे. फक्त काय तो ‘लुक’ नाही. बाकी सर्व व्यवस्थित.
पण मला अप्सरे सारखी मुलगी हवी आहे. जी ला पाहिल्यावर मनात ‘ही माझी झाली तर..’ असा विचार येईल. आणि जी ला पाहिल्यावर दुसरे काहीच सुचणार नाही. आणि मनात दुसऱ्या कोणत्याच मुलीचा विचारही येणार नाही आणि इच्छाही होणार नाही. आणि ती सुद्धा फ़क़्त माझाच विचार करेल. जी माझ्याशी बायको नव्हे मैत्रिणी प्रमाणे राहिलं. माझ्याशी मस्ती करेल. पुतळा नको. म्हणजे कसं की, तिला आपण आज बाहेर जेवायला जाऊ या का अस विचारल्यावर ताबडतोप ‘हो’ म्हणेल अशी. किरकिर नको. तसे रोजही जाणे मला परवडणारे नाही. मला समजून घेणारी. अशी हवी मला. नाहीतर मग, दोघातील एक नाराज असेल त्या लग्नाला आणि त्या संसाराला काय अर्थ? काल माझ्या मित्राशी याच विषयावर बोलत असतांना तो म्हणाला. तसे माझ्या सर्वच मित्रांचे ‘लग्न’ बद्दल इतके निर्णय कसे काय पक्के आहेत हेच कळत नाहीत. तो म्हणत होता, जर बी.ए, बी.कॉम, बी.एस्सी असलेली मुलगी केली तर त्यांना घरात रस असतो. आणि ते आपल्या आज्ञेत राहतील. त्यामुळे वादावादी होणार नाहीत. आणि जर प्रेम विवाह केला तर सगळेच ‘हात’ वरती करतील. कारण निर्णय दोघांचा असेल. आणि पुढे जाऊन दोघात वादावादी झाली तर कोणीच मिटवायला येणार नाही. आणि पुन्हा घरचे दोघांना नावे ठेवत बसतील.
पुढे तो मला म्हणत होता, कशाला खेळत बसला आहे. जी भेटेल तिला हो म्हणून लग्न करून टाक. बाकीच्या मित्रांचे सुद्धा थोड्या फार फरक सोडला तर असेच आहे. पण मला मुलीशी मतलब आहे. शिक्षण, व्यवसाय हे काय आयुष्यात सर्व काही नसते. दोघांची मन जुळली. एकमेकांना दोघे आवडतात हे देखील महत्वाच नाही का? आत्तापर्यंत आई वडिलांना मी कोणत्याच गोष्टीला कधी नाही म्हटले नाही. म्हणजे तशी हिम्मतही केली नाही. मुळात हिम्मत झालीच नाही. आणि त्यांचे निर्णय नेहमी अचूक असतात. त्यामुळे निर्णय नेहमीच फायद्याचे असतात. आणि ते देखील खूप चांगले आहे. माझेही सर्व लाड पुरवले आहेत. मला संगणक कोर्सच, संगणक, मोबाईल आता घर अशा गोष्टीत कधीच टाळाटाळ केली नाही. माझ्या निर्णयाला नेहमी पाठींबा दिला. खर तर माझ्यासारखा इतका फालतू मुलगा अशा ठिकाणी असण्याचे सर्वच श्रेय त्यांनाच आहे. मुळात मी एक शून्य आहे. ते आहेत म्हणून किंमत आहे. पण या निर्णयाच्या माझा खूप गोंधळ उडाला आहे. म्हणजे स्थळ पाहायला सुरवात जानेवारीत- फेब्रुवारी केली. त्यावेळी माझ्या मनात आई वडील जो निर्णय घेतील तो बरोबर असेल अस होत. आता माझ्या मनात खूप इच्छा वाढत आहेत. म्हणजे मी भाजी पाल्याप्रमाणे कधीच मुलींची ‘निवड’ केलेली नाही.
पण आता मला ती ‘अप्सरा मनामध्ये भरली’ आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर माझे आता मुली निवडण्याचा कार्यक्रम बंद झालेला आहे. मला दुसरी नको आता. असो, आता पाणी गळ्यापर्यंत आले आहे. वडिलांना मी फोनवर सोमवार संध्याकाळ पर्यंतची मुदत घेतली आहे. आता त्या अप्सरा सोबत बोलाण्यावाचून काही पर्यायाच नाही उरला आहे. सोमवारी तिच्याशी मी बोलेले. जर तिला माझ्यात रस असेल तर ती ही माझ्याशी पुन्हा बोलायचा प्रयत्न नक्की करेल. तसे मी विषय, संबंध आणि ओळख नसतांना देखील कोणाशीही बोलू शकतो. कालच मी एका मुलीशी बोललो. माझ्या मित्रांनी त्या मुलीशी बोलून दाखव अशी माझ्याशी पैंज लावली होती. हाहा! आणि मी ती जिंकली. पण ती अप्सरा समोर आली की हिम्मत जाते. पण मी नक्की बोलेल. आता नाही तर कधीच नाही.
चिंता नसावी, मला माझ्या ‘बोलबच्चन’वर विश्वास आहे. काहीतरी पिल्लू कारण काढून मी तिच्याशी दोन पाच मिनिटे नक्की बोलेले. आणि तिलाही माझ्याशी पुन्हा बोलायची इच्छा निर्माण करेल. आणि जर माझ्यासोबत पुन्हा ती स्वतःहून बोलली तर मग, त्या स्थळाला माझा ‘नकार’ पक्का होईल. नाहीतर निमुटपणे होकार देऊन हा विषय संपवून टाकेल.

No comments:

Post a Comment