Saturday 28 April 2012

टीव्ही आणि मी

दोन वर्षांपूर्वी मी मुंबईच्या एका आयटी कंपनीत रुजू झालो होतो. त्यावेळी मी माझ्या गिरगावमध्ये मावशीकडे राहायला होतो. तसा गिरगावात मी एकच महिना होतो. पण याच काळात माझ टीव्ही विषयीचे मत बनायला सुरवात झाली. कंपनीची अशी काही ठराविक वेळ नव्हती. कधीही या आणि आठ तास काम करून घरी जा. माझी कंपनी डीएन रोडवर होती. मला माझ्या मावशीचे घर ते कंपनी हे अंतर बेस्टने दहा मिनिटे आणि चालत २० मिनिटे. मी सकाळी दहाच्या सुमारास कंपनीत जायचो आणि ६:३० पर्यंत घरी यायचो. घरी आल्यावर फ्रेश होता होता सात वाजून जायचे. काय गप्पा होतील ते याच वेळेत. सात वाजले रे वाजले सगळे पहिल्या खोलीत टीव्ही समोर. मी त्यांच्याकडे पाहुणा म्हणून मी कधी काही बोलत नसायचो. त्यांचे ठरलेले कार्यक्रम सात ते दहा या वेळेत असायचे.
त्यांच्या बरोबर मलाही सासू आणि बायको नसताना त्यांच्यातील भांडण कळायची. त्या गोजिरवाण्या घरातील सगळी लफडी समजायची. बर ते सोडा. दहानंतर यांचे जेवायचं बेत. तोपर्यंत या मालिकांनी माझा फार डोक्याचा भाजीपाव केला असायचा. एक महिन्याच ते दिव्य कस बस सहन केल. कधी कधी मावशीने एखादा भाग पाहायचा राहून गेला तरी ती दुसऱ्या दिवशी फोन करून तिच्या मैत्रिणीला विचारायची. मग त्या विषयावर तासभर फोनवर. जेवताना त्यांचा तोच विषय. ह्याने असं केल त्याने तसं केल. सुरवातीला मला वाटायचं की हे चाळीतील लोकांबद्दल बोलत असावे. पण काही भाग पाहिल्यावर मीही समजलो. एका महिन्यानंतर माझ्या बोरिवलीच्या मावशीचे जुने घर मोकळेच होते. तिथ यातून सुटकारा मिळाला. पण कधी त्या मावशीकडे जाण्याचा योग आला तर तिथेही असलेच अनुभव. वर्षभरापूर्वी मी पुण्यातील एका कंपनीत रुजू झालो. राहण्याची व्यवस्था काकाकडे होती. पण इथ पण तेच सकाळी सकाळी काका टीव्हीसमोर, तो गेला की काकू, मग शाळेतून दुपारी माझे लहान बहिण भाऊ यायचे. मग ते टीव्हीसमोर. काका येण्याच्या दहा मिनिटे आगोदर ते टीव्ही बंद करायचे. पुन्हा काका संध्याकाळी आल्या पासून ते दहा-अकरा वाजेपर्यंत टीव्ही चालूच. जेवण पण टीव्ही समोरच. झोप देखील तिथेच.
याचा एक फायदा नक्की झाला की, घरातील भांडण कमी झाली. कारण कोणालाच बोलायचं वेळ नसायचा. एक मालीका संपली की दुसरी. आणि ते नसेल तर कार्टून चैनल आहेच. आणि ते नसेल तर जुने मराठी चित्रपट, आणि तेही नको वाटले तर चोथाही नसलेल्या विषयाचा अर्क काढणारी न्यूज चैनल आहेतच. मग कशाला कोण सोडतंय? पण या सगळ्या गोष्टींमुळे माझा टीव्हीतील रस कधीच निघून गेला. मित्राच्या रूमवर एकदा गेलो तिथे त्यांनी चैनल पाहण्यासाठी खास टीव्ही ट्युनर आणला होता. कोण मित्राच्या घरी गेलो की ते ये म्हणायचे आणि टीव्ही चालू करायचे. मग मला हे समाजात नसायचे की त्यांना टीव्ही बघायचा आहे की माझ्याशी बोलायचे आहे? सुट्टीत कोकणातील काकाकडे गेलो होतो. माझ्यामुळे निदान दोन – तीन दिवस टीव्ही बंद होता. माझ्या काकाने म्हणून दाखवले की आमचे आधी जेवणात गप्पा हा प्रकारच नव्हता. सगळे जेवायाला बसणार पण सगळ्यांचे लक्ष टीव्हीत. माझ स्वत:च घर घेतलं त्यावेळी मी ठरवलं होत की टीव्ही घरात आणणार नाही. पण काय करणार आईच्या हट्टापायी आणावा लागला. आणि केबलसुद्धा जोडून द्यावी लागली. पण हे शेजारचे आल्यापासून काही विचारू नका. बहुतेक शेजाऱ्यांचा जन्म चित्रपट गृहातील असावा. अशी शंका येते. त्यांचे बोलण्याचे स्वर आणि टीव्हीचा आवाजाला तोड नाही. का त्यांची दवंडी देणाऱ्याच्या कुळातील हेच समजत नाही. या सगळ्या प्रकारामुळे माझ डोक निदान ठीक राहत हेच आश्चर्य मानायला हव. असं माझी आणि टीव्हीची मालिका कधी खंडित होणार देव जाणे. का तीही ‘चार पाच दिवस सासूचे’ आणि ‘दामिनी (कधीही न संपणारी)’ किंवा ‘असंभव (ज्यात काहीही संभव)’ अशी चालू राहणार?. याच उत्तर मी काही पुढील भागात वगैरे देणार नाही आहे. किंवा ब्रेकिंग देखील देणार नाही आहे. किंवा प्रीमियर शो करणार नाही आहे. पण सध्याला तरी दस का दम प्रमाणे चालू आहे.

No comments:

Post a Comment